भाऊबीज (यमद्वितीया)(कार्तिक शुद्ध द्वितीया)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा



अनुक्रमणिका



१. कथा व विधी

`कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्‍नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितले आहे.


या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.' एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळतात. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी व यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अपमृत्यु येत नाही. अपमृत्यु निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।' असा संकल्प करून तर्पण करावयाचे. हा विधि पंचांगात दिला आहे, तो पहावा.
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `सण, धार्मिक उत्सव व व्रते')


२. बहीण नसलेल्या भावाने अन्य स्त्रीच्या घरी जाऊन जेवण्यामागील शास्त्र

यमलहरींना प्रत्यक्ष संचारण्यासाठी बल देणे, हे प्रत्येकाचे धर्मकर्तव्य असल्यामुळे शास्त्रात बहीण नसलेल्या भावालाही अन्य स्त्रीच्या घरी जाऊन जेवण्यासाठी सांगितलेले असणे

धर्मात सांगण्यात आलेले कर्तव्य हे जिवाच्या व्यष्टी, तसेच समाजाच्या समष्टी या दोन्ही घटकांना प्रत्यक्ष ऊर्जाबल पुरवून त्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती करत असल्यामुळे धर्मात सांगण्यात आलेले कर्म करणे, हे प्रत्येक जिवाचे कर्तव्य ठरते. यमलहरींना प्रत्यक्ष संचार करण्यासाठी बल देणे, म्हणजेच प्रत्यक्ष सृष्टीकर्मात ईश्‍वराने ठरवलेले आपले कर्तव्य पार पडणे असल्यामुळे `भाऊबिजेच्या दिवशी बहीण नसलेल्या भावानेही अन्य स्त्रीला बहीण समजून तिच्या घरी जेवण्यासाठी जावे', असे धर्माने सांगितले आहे. बहीण नसलेल्या पुरुषाद्वारे अन्य स्त्रीला बहीण मानून तिच्या घरी जाऊन भोजन करणे म्हणजेच `मनुष्याने धर्मासाठी आपले पूर्ण कर्तव्य पार पाडणे', असे म्हटले जाते. अशा प्रकारे धर्मासाठी पूर्ण प्राणपणाने कर्म करणार्‍या जिवाची उन्नती लवकर होते.
- (श्री. निषाद देशमुख यांना चिंतनाच्या माध्यमातून मिळालेली माहिती, १२.१०.२००६, सकाळी ११.३६)


३. यमलहरींना प्रत्यक्ष ऊर्जाबलता न पुरवल्यास जिवाला होणारे तोटे

अ. प्रत्यक्ष संचार करणार्‍या यमलहरींना पुढे नेणारे क्रियाबल न पुरवल्यामुळे जिवाचा लिंगदेह खूप काळासाठी अडकलेल्या अवस्थेत भुवलोक किंवा अन्य योनी यांत रहातो.
आ. जिवावर यमदेव रुष्ट झाल्यामुळे त्याच्या प्रकोपस्वरूपी प्रत्यक्ष मृत्यूलहरींचे प्रक्षेपण जिवाच्या कालचक्रावर झाल्यामुळे त्याला अकालमृत्यूचा अंगीकार करावा लागतो किंवा त्याला सतत लयदर्शकात्मक घटनांचा सामना करावा लागतो.
इ. जिवाच्या देहात प्रत्यक्ष भोगासाठी आकृष्ट झालेल्या लहरींची तृप्‍तता न झाल्यामुळे त्या लहरींच्या विघटनजन्य प्रक्षेपणामुळे त्याच्या शरीरात विविध ठिकाणी दाब निर्माण होऊन त्याला शरीरात विविध ठिकाणी दुखणे, हृदयविकार होणे, तो बेशुद्ध पडणे, अशा प्रकाराचे त्रास होतात.
ई. जिवाद्वारे प्रत्यक्ष धर्मस्वरूपाची व ईश्‍वरवाचक संज्ञेची अवज्ञा झाल्यामुळे त्याला धर्मदंड भोगावा लागतो.
उ. जिवाने सृष्टीच्या संचालनासाठी सहकार्य न केल्यामुळे त्याला समष्टी पाप भोगावे लागते.
ऊ. भाऊबिजेसारख्या सणाच्या माध्यमातून जिवाला समाजऋण व देवऋण फेडता येते. याउलट भाऊबीज साजरी न केल्यास जिवाला समाजऋण व देवऋण फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १२.१०.२००६, सकाळी ११.४९)


४. भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण, धार्मिक कृती आदींच्या माध्यमातून जिवाला सर्व प्रकारचे ऋण फेडणे शक्य होणे

भारतीय संस्कृतीमध्ये सांगण्यात आलेले विविध सण, विधी आदींच्या माध्यमातून जिवावर असलेले देव, पितर, समाज आणि ऋषी ऋण फेडले जातात. साधना न करणार्‍या जिवालापण हे सर्व ऋण फेडणे शक्य व्हावे; म्हणून विविध कालखंडांत विविध प्रकाराच्या धार्मिक कृती, सण, धार्मिक विधी साजरे करण्याचे नियम घातले गेले आहेत. - एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १२.१०.२००६, सकाळी ११.५४)



0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: